Jalgaon Medical College : जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे, तर विविध भागांतून विद्यार्थी या ठिकाणी येतात…मात्र याच महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता रॅगिंगचा मुद्दा ऐरणीवर आलाय…
पहिल्या वर्षापासून बाथरूममध्ये नेऊन मारहाण…पट्ट्याने मारहाण…बाहेरील मुलांना रूममध्ये झोपवून त्यांच्याकडून मारहाण…असे गंभीर आरोप या विद्यार्थ्याने केले आहेत…रॅगिंगबाबत तक्रार केल्यानंतरही त्रास थांबला नाही, उलट प्राध्यापकांकडूनच धमक्या देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या आईने केलाय…तर दुसरीकडे विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनंतर तीन ते चार वेळा समितीमार्फत चौकशी करण्यात आली असून, चौकशीत रॅगिंगचे कोणतेही तथ्य आढळले नसल्याचं महाविद्यालय प्रशासनाचं म्हणणं आहे…मग नेमकं या प्रकरणात काय घडलं?
विद्यार्थ्याचे आरोप काय आहेत?
महाविद्यालय प्रशासनाची भूमिका काय आहे?
आणि आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का?
चला, जाणून घेऊयात…
जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा आरोप; विद्यार्थ्याच्या तक्रारीने खळबळ ( Jalgaon Medical College Ragging )
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासूनच त्याला रॅगिंगचा त्रास सहन करावा लागत होता. बाथरूममध्ये नेऊन मारहाण करणे, पट्ट्याने मारहाण करणे, तसेच बाहेरील मुलांना रूममध्ये बोलावून त्यांच्याकडून मारहाण करवून घेणे, असे प्रकार आपल्यासोबत घडल्याचा दावा त्याने केला आहे.
हा त्रास केवळ रॅगिंगपुरता मर्यादित नव्हता, तर त्याच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक स्थितीचाही प्रश्न निर्माण झाल्याचं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे.रॅगिंगबाबत तक्रार केल्यानंतर आपल्यालाच मानसिक रुग्ण ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. इतकंच नाही, तर आपल्याला शिक्षणापासून दूर करून घरी बसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही दावा त्याने केला आहे. विद्यार्थ्याच्या आईनेही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
मुलाने रॅगिंगची तक्रार केल्यानंतर त्याला संरक्षण मिळण्याऐवजी प्राध्यापकांकडूनच धमक्या देण्यात आल्याचा आरोप आईने केला आहे. त्यामुळे आपल्या मुलाला सुरक्षित वातावरणात शिक्षण पूर्ण करता यावं, त्याचं शिक्षण मध्येच थांबू नये आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्याच्या आईने केली आहे.
Jalgaon Medical College : मात्र, या आरोपांबाबत महाविद्यालय प्रशासनाची भूमिका वेगळी आहे. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनंतर महाविद्यालयाकडून तीन ते चार वेळा समितीमार्फत चौकशी करण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. या चौकशीत रॅगिंगचे कोणतेही तथ्य आढळले नसल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली असून, त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ पातळीवरून पुन्हा समितीमार्फत चौकशी करण्यात आली, तरी महाविद्यालय प्रशासन त्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा : मेहरूण तलावात सांडपाणी; गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर
तक्रार केल्यानंतर प्राध्यापकांकडून धमक्यांचा आरोप ( Jalgaon Medical College )
एकीकडे विद्यार्थ्याचे रॅगिंग, मारहाण आणि धमक्यांचे गंभीर आरोप…तर दुसरीकडे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा महाविद्यालय प्रशासनाचा दावा…त्यामुळे या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. मात्र या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय…विद्यार्थ्याने इतके गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय नेतेमंडळी या प्रकरणावर अद्याप शांत का आहेत? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि रॅगिंगचा प्रश्न असताना, या प्रकरणाची लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जाणार का? आणि दुसरीकडे…पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावत आहे? विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीच्या आरोपांची पोलीस पातळीवर चौकशी झाली आहे का? रॅगिंग, मारहाण आणि धमक्यांचे आरोप करण्यात आले असतील, तर त्याबाबत पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली? विद्यार्थ्याच्या तक्रारीची कायदेशीर पातळीवर दखल घेतली आहे का? हे प्रश्नही आता तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत.
महाविद्यालयीन समित्यांकडून चौकशी झाली असल्याचं प्रशासन सांगतंय…मात्र विद्यार्थ्याने केलेले आरोप गंभीर असल्याने महाविद्यालयीन चौकशीसोबतच पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे, याबाबतही स्पष्टता येणं गरजेचं आहे.तर दुसरीकडे, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि संबंधित प्रशासन याप्रकरणी पुढे येणार का?
हा प्रश्नही आता जळगावकरांकडून ( Jalgaon ) उपस्थित केला जातोय. कारण…रॅगिंगचे आरोप खरे असतील, तर दोषींवर कारवाई होणं गरजेचं…आणि आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर तेही चौकशीत स्पष्ट होणं तितकंच महत्त्वाचं…पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावं, ही जबाबदारी महाविद्यालय प्रशासनासोबतच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचीही आहे.आता या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून चौकशी होते का…पोलीस प्रशासन याची स्वतंत्र दखल घेते का…आणि राजकीय नेतेमंडळी या गंभीर आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करतात का…याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे……








