जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Maratha Reservation News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला छत्रपती संभाजी सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, मराठा समाजाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांनी एकेरी उल्लेख करू नये, अशी मागणी छत्रपती संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाट यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली.
राजकीय आरक्षण नको; शिक्षण आणि नोकरीत सवलत द्या ( Maratha Reservation News )
मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठे काम केले असून, त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचा दावा छत्रपती संभाजी सेनेने केला आहे. २० फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग कायदा २०२४’ मंजूर करून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के कायदेशीर आरक्षण देण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले.
तसेच ईडब्ल्यूएसमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत, एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, बँकिंग यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षणाची उपलब्धता आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असून, त्यासाठी शैक्षणिक आरक्षणासोबतच नोकरीत सवलतीची गरज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. मात्र, मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
हेही वाचा : कांचननगरात घरात घुसून महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न? अश्लील शिवीगाळ, मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी ‘मराठा जोडो अभियान’
अंतरवाली सराटी येथील आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण झाल्याचा दावा छत्रपती संभाजी सेनेने केला. यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर ५८ मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी विविध जाती-धर्मांचे नागरिक एकत्र सहभागी झाले होते. मात्र, सध्या दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याने ही दरी दूर करण्यासाठी छत्रपती संभाजी सेना महाराष्ट्रभर ‘मराठा-ओबीसी जोडो अभियान’ राबवणार असल्याची घोषणा करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख टाळावा. मोठ्या नेत्याचा अपमान करणे समाजाला मान्य होणार नाही, असेही लक्ष्मण शिरसाट यांनी स्पष्ट केले.



