Sant Sena Maharaj Jayanti : संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे नाभिक समाजाच्या वतीने श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विसरवाडी येथे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी ( Sant Sena Maharaj Jayanti )
पंकज जगन्नाथ पवार यांच्या राहत्या घरी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिभावाने महाआरती व सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संत सेना महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत नाभिक समाजबांधवांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संत सेना महाराजांच्या विचारांचा जयघोष करत निघालेल्या शोभायात्रेमुळे विसरवाडीमध्ये उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : गणेश विसर्जन मिरवणुकीआधी जळगाव प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये;
मान्यवरांचा सत्कार करून कर्तृत्वाचा गौरव
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सार्वजनिक हायस्कूलचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर यांचा सत्कार किसन भिका हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. मांडे सरांचा सत्कार शांताराम सैंदाणे यांनी केला. तसेच माळी सरांचा सत्कार आनंद अहिरे यांनी, तर बापू मेटकर यांचा सत्कार मनीलाल बिरारे यांनी करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, उपाध्यक्ष दीपक सैदाणे , सचिव हर्षल बिरारे यांच्यासह समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आनंदा हिरे, मनीलाल बिरारे, गणेश सोनवणे, योगेश पवार, संजय सूर्यवंशी, पंडित बाबुराव हिरे, शरद नारायण सूर्यवंशी, चेतन बिरारे, कैलास ईशी, किसन दादा, किरण बोरसे, दिलीप हिरे, किसन हिरे यांच्यासह नाभिक समाजातील असंख्य समाजबांधवांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संत सेना महाराजांचा विचार हाच समाजाच्या एकतेचा आधार
Sant Sena Maharaj : संत सेना महाराजांनी आपल्या जीवनातून सेवा, समता, प्रामाणिकपणा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि समाजात एकोपा निर्माण करणे हीच संत सेना महाराजांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
धार्मिक कार्यक्रमासोबतच गुणवंतांचा सन्मान आणि समाजबांधवांची एकजूट यामुळे यंदाची संत सेना महाराज जयंती विशेष ठरली. भक्ती आणि सामाजिक एकतेचा सुरेख संगम घडवून आणणारा हा सोहळा विसरवाडीकरांच्या स्मरणात कायम राहील.


