Eknath Khadse Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (३० ऑगस्ट) मुक्ताईनगर येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा ७५वा अमृत महोत्सव उत्साहात ( Eknath Khadse Birthday )
“महाराष्ट्राच्या राजकारणात नाथाभाऊंचे मोठे योगदान आहे. विधिमंडळाच्या कामकाजापासून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्यापर्यंत त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. विरोधी पक्षनेते आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम तसेच घेतलेले निर्णय प्रेरणादायी आहेत,” असे शशिकांत शिंदे म्हणाले.
खडसे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध आणि प्रदीर्घ राजकीय कारकीर्द यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती लाभत असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. “सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती ही नाथाभाऊंच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची पोचपावती आहे,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवासाठी शरद पवार जळगावात
मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही भाष्य ( Mohan Bhagwat )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाजघटकांचे योगदान असल्याचे सांगितले. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाचाही समावेश होता. प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन घडवलेली ही भारताची ओळख आहे,” असे ते म्हणाले.
देशातील आणि राज्यातील सध्याच्या वातावरणाचा उल्लेख करत शिंदे यांनी भागवत यांनी आपला संदेश भाजपमधील तसेच विविध हिंदू संघटनांमधील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा, असे मत व्यक्त केले. देशविरोधी कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेणे योग्य असले, तरी एखाद्या समाजाला लक्ष्य करून राजकारणासाठी त्याचा वापर करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोहन भागवत यांनी मांडलेले विचार भाजप नेते आणि संघटनेतील संबंधितांपर्यंत पोहोचल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.








