ST Bus Accident : चाळीसगाव : छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात होता होता टळला. बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याकडे गेली आणि कठड्याला अडकून थांबली.
कठड्यामुळे मोठा अनर्थ टळला ( Kannad Ghat ST Bus Accident )
बस थांबताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या बसमधून तब्बल ५९ प्रवासी प्रवास करत होते. अचानक बसचा ताबा सुटल्याने काही क्षणांसाठी प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. बस कठड्याला अडकल्यानंतर काही प्रवाशांनी घाबरून खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यामुळे बस आणखी खाली घसरली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बस सुरक्षितपणे थांबल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : जळगावच्या महामार्गावर खड्डे, अपघात अन् धोकादायक चौक; प्रशासन झोपलंय का?
स्टिअरिंग रॉड तुटला की यंत्रणा जाम झाली? ( ST Bus Accident )
बसच्या स्टिअरिंगमध्ये नेमका कोणता बिघाड झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्टिअरिंग रॉड तुटल्यामुळे हा प्रकार घडला की स्टिअरिंग यंत्रणा जाम झाली, याचा तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बसची तांत्रिक तपासणीही केली जात आहे.
५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला
कन्नड घाटातील या घटनेने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बस कठड्याला अडकल्याने मोठा अपघात टळला. काही क्षणांचा हा थरार संपल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेनंतर एसटी बसच्या तांत्रिक स्थितीची तपासणी आणि वाहनांच्या देखभालीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.




