हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला.

विदर्भाची पारंपरिक खाद्यसंस्कृती असलेल्या प्रसिद्ध सावजी मटणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या एका विधानामुळे या वादाला फोडणी मिळाली असून, त्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जाणारे धडकनिशी अधिकारी तुकाराम मुंढे आणि विदर्भाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या थेट संघर्षामुळे हा केवळ खाण्यापिण्याचा विषय न राहता त्याला तीव्र राजकीय रंग चढला आहे. सोशल मीडियापासून ते थेट विदर्भातील रस्त्यांवर आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये या विधानावरून प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. काय आहे हा टोटल घोळ, पाहूयात या व्हिडिओतून…

नमस्कार मी मृणाली…

हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला. अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नेहमीच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम या विषयावर भाष्य केले. अति तेलकट, अतितिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे मानवी शरीराला, विशेषतः हृदयाला कसा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे ते समजावून सांगत होते. हे सांगताना त्यांनी नागपूर आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा प्राण मानल्या जाणाऱ्या सावजी मटणाचे उदाहरण दिले.

आपल्या रोखठोक शैलीत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, जर माझ्यासारख्या माणसाने नागपूरचे ते प्रसिद्ध सावजी जेवण जेवले, तर अति तिखट आणि तेलकट असल्यामुळे मी किमान एक महिना आजारी पडेन आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अशा प्रकारच्या ऑईली फूडमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असा इशारा देत नागरिकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला. तुकाराम मुंढेंचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

बाईट-तुकाराम मुंडे

विदर्भातील पारंपरिक हलबा कोष्टी समाज आणि सावजी हॉटेल व्यावसायिक या विधानामुळे कमालीचे संतापले. सावजी ही केवळ एक डिश किंवा केवळ मटणाचा प्रकार नसून, ती विदर्भाची अनेक पिढ्यांची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. हलबा समाज युवा संघटनेने मुंढेंच्या या विधानाचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली. अनेक हॉटेल मालकांनी मुंढेंना लक्ष्य करत म्हटले की, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि चमकोगिरीसाठी अशा प्रकारे एका मोठ्या पारंपरिक उद्योगाला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नागपूरच्या काही हॉटेल व्यावसायिकांनी तर थेट तुकाराम मुंढेंना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यांना जाहीर माफी मागण्याचे खुले आव्हान दिले आहे, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *